Erotica वलय (कादंबरी) Marathi latest 2021 sex story

66
1
8
वलय - प्रकरण १६

ही घटना राजेश जवळ जवळ विसरून गेला.

आर्ट्सला शिकत असतांना राजेशने सहज म्हणून एक छोटी थरारक आणि रहस्यमय कादंबरी लिहिली: "खेळ हा नशिबाचा!.

त्याचे हस्तलिखित त्याने एका मुंबईच्या नवीनच सुरु झालेल्या दिवाळी अंकाला पाठवले ("कथामंथन").

काही दिवसांनी संपादक विभागाचे पत्र त्याला आले. कथा संपादकाना आवडली आहे. पण ती थोडी आणखी मोठी करावी असे त्याला सांगण्यात आले. त्यात आणखी जास्त संवाद टाकावे असेही त्याला सांगण्यात आले.

मग त्याने आणखी संवाद टाकून त्याने ती एक दीर्घ कादंबरी बनवली आणि पुन्हा पाठवली:

ती कथा थोडक्यात अशी होती –

"एका खेडेगावातला १५ वर्षांचा मुलगा त्याच्या वडिलांसह तालुक्याच्या गावी यात्रेत एका कार्यक्रमांचं तिकीट लकी ड्रॉ जिंकल्यामुळे जातो. तो कार्यक्रम बघून आणि यात्रेतला बाजार फिरून झाल्यानंतर मुलगा वडिलांचे लक्ष नसतांना त्याच्या धुंदीत एका स्टॉल वरच थांबतो. वडील सहज फेरफटका मारायला पुढे जाऊन परत येतात तर तो मुलगा तिथे नसतो. तो मुलगा यात्रेत घुसलेल्या एका स्मगलर्सच्या टोळीच्या तावडीत योगायोगाने सापडतो. त्यानंतर त्याचा एक चित्तथरारक प्रवास सुरु होतो - अचानक एका अशा जगाशी त्याची ओळख होते ज्या जगाचा त्याने आपल्या आयुष्यात कधी विचार सुद्धा केला नसता. मग आणखी एका योगायोगाच्या घटनेत त्याचेकडून टोळीतल्या एकाचा खून होतो आणि तो तेथून निसटतो. मग गुंड त्याचे मागे लागतात.. इकडे त्याचे वडील पोलिसांत तक्रार करतात. अनेक दिवस जाऊनही काहीच थांगपत्ता न लागल्याने ते स्वत:च जीव धोक्यात घालून मुलाला शोधायचे ठरवतात. तो सापडत नाही. नंतर दोन वर्षांनी एका विचित्र प्रसंगात त्यांची आपल्या मुलाशी भेट होते पण तो पार बदललेला असतो…."

संपादकांचे उत्तर आले - "आणखी संवाद टाकण्याची आमची विनंती मान्य करून कथेची सुधारित आवृत्ती पाठवल्याबद्दल धन्यवाद! आता मुख्य संपादकांच्या फायनल सिलेक्शनची फेरी होईल. त्यात तुमची कादंबरी सिलेक्ट झाली की मग दिवाळी अंक प्रकाशित होण्याच्या एक महिना आधी तुम्हाला निर्णय कळवला जाईल. कादंबरी सिलेक्ट होईलच याबद्दल खात्री बाळगा. साहित्य पाठवत राहावे ही विनंती!"

बरेच दिवस वाट बघितल्यावर कुठलाच पत्रव्यवहार न आल्याने त्याने एक दोनदा दिवाळी अंक कार्यालयाला एसटीडी बूथ वरून फोन केला. फोन सतत बिझी यायचा. चार महिन्यांनी दिवाळीच्या एक आठवडा आधी त्याने पेपर स्टॉल्सवर चौकशी केली तर त्याला कळले की तो अंक बाजारात आलाच नाही. अनेक पेपर स्टॉल आणि न्यूजपेपर व्हेंडर्सकडे तो जाऊन आला. त्याचे हस्तलिखित सुद्धा पोस्टाने परत आले नव्हते. त्याची झेरॉक्स सुद्धा त्याने काढली नव्हती. पुन्हा त्याच्या मेंदूत शाळेतली घड्याळाची घंटा वाजली. खारकाते सर त्याला अचानक आठवून गेले.

कथेचे काय झाले याचा छडा लावण्यासाठी तो तडक मित्रासोबत मुंबईला गेला. दादर पश्चिमला दिवाळी अंकाच्या कार्यालयाचा पत्ता शोधत शोधत तो आणि त्याचा मित्र विनीत भर दुपारी एक वाजता घामाने चिंब होत एका गल्लीत पोहोचले.

पत्त्यानुसार ते कार्यालय वरच्या मजल्यावर होते. लोखंडी गोल वळणाच्या पायऱ्या चढून ते वर गेले. तेथे छोटे ऑफिस होते - "येथे स्टँप पेपर मिळतील" असे लिहिलेले होते.
"इथे दिवाळी अंकाचे कार्यालय होते ना?"

"होय, पण ते दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी सोडले"

"काय? त्यांनी कार्यालय सोडले?"

"होय! माझे ऑफिस आधी खाली होते. मग त्यांनी सोडल्यावर आम्ही वर शिफ्ट झालो! वर भाडे कमी आहे!"

"बरं, ते ऑफिस कुठे शिफ्ट झाले ते कळू शकेल काय?"

"नाही बुवा. पण एक गोष्ट म्हणजे ऑफिस सोडताना त्यांनी घरमालकाशी खूप वाद घातला होता. पैसे पण दिले नाहीत शेवटच्या महिन्याच्या भाड्याचे!"

"काय?"

"होय! पण तुम्हाला कुणाला भेटायचं होतं का?"

"नाही. ठीक आहे. धन्यवाद! फक्त चौकशी करायची होती!"

राजेश आणि विनीत परत जायला निघाले आणि काहीतरी आठवून राजेश पुन्हा वर चढून आला आणि त्याने त्या माणसाला विचारले - "बरं, इथे असणारी माणसे दिसायला कशी होती? किती माणसे ऑफिसमध्ये काम करत होती?"

त्या माणसाला संशय आला, म्हणाला, "तुम्ही सीआयडीवाले आहात की "एक शून्य शून्य" ही पोलिसांवरची टीव्ही मालिका जास्ती बघता? नक्की काय समजू मी?"

विनीत म्हणाला, "नाही हो काका! आता काय सांगणार तुम्हाला!! याने एक कथा पाठवली होती छापायला! त्याबद्दल विचारायचे होते, बाकी काही नाही!"

"बरं! बरं! सांगतो! एकजण इथला मुख्य कर्मचारी होता - त्याचे नाव …..?? एक मिनिट! हां आठवले!! त्याचे नाव होते - रत्नाकर रोमदाडे! आणि त्याचा साथीदार ?? त्याला सगळे गोप्या म्हणायचे! आणि दिसायला रत्नाकर हा टक्कल पडलेला आणि वर्ण सावळा. थोडे पोट पुढे आलेले आणि उजव्या गालावर कसलातरी मोठा काळा डाग आहे. अगदी लक्षात येण्यासारखा काळा डाग!

"ओके अंकल! धन्यवाद!" राजेश म्हणाला.

"अंकल! आपण चहा नाश्टा करूया का? चला जाऊ!" विनीत त्या माणसाला म्हणाला.

"नको नको! आता बरीच कामं पडलीत. बोलावल्याबद्दल धन्यवाद!"

"ओके अंकल! बरंय येतो आम्ही!"

दादर स्टेशनवर त्यांनी दोन दोन वडापाव खाल्ले. मग वेस्टर्न लाईनला जाऊन दोघांनी मरीन लाईन्सला जायचे ठरवले.

5:35 ची स्लो लोकल पकडून ते मरीन लाईन्सला आले. थोडा समुद्राच्या कडेने फेरफटका मारून घडलेल्या गोष्टीवर विचार करून काही तोडगा किंवा उपाय करता येईल असे त्यांना वाटले.

"काय करू विनीत मी आता?"

"तू त्या स्टोरीची झेरॉक्स सुद्धा काढून ठेवली नाहीस?"

"हो रे! जरा चुकलंच माझं!"

राजेश मनात म्हणत होता, "चुकलं? एकदा नाही तर दोनदा चुकलं! एकदा अनुभव नव्हता म्हणून फसलो आता मात्र दुसऱ्या वेळेस एक पहिला वाईट अनुभव पाठीशी असतांना सुद्धा पुन्हा फसलो! खूप विश्वास ठेवला..."

"काय झालं? कसल्या विचारात गाढ बुडाला आहेस?"

"काही नाही! मी ती कादंबरी पुन्हा लिहून काढणार! मी हार मानणार नाही. माझी ती कादंबरी त्या नालायक संपादकाने इतर कुठे त्याच्या स्वत:च्या किंवा इतर कुणाच्या नावाखाली छापायला दिली आहे का ते बघावे लागेल!"

"मग त्यासाठी तुला दिवाळी अंकांची लायब्ररी लावावी लागेल. मी तुला शोधायला मदत करेन! मला तुझी कथा घरी गेल्यावर थोडक्यात सांग!"

"ठीक आहे. जर ती कुठे छापून आली नसेल तर मी दिवस रात्र मेहनत करून ती कथा पुन्हा कागदावर लिहून काढेन. पूर्वीसारखं जसंच्या तसं आठवणार नाही मला पण मी लिहेन! आणि पुन्हा पाठवेन दुसरीकडे!", राजेश निर्धाराने म्हणाला.

"आणि जर का ती इतर कुणाच्या नावाने या वर्षीच छापून आली असेल तर? तर मग काय करायचे आपण?", विनितची शंका बरोबर होती.

"ते मलाही माहीत नाही, पण आधी आपण जे ठरवलं आहे ते करूया!" राजेश म्हणाला.

तिकडे अरबी समुद्र अधून मधून खवळत होता आणि मोठमोठ्या लाटा दगडांवर आदळत होता. हे दोघे मरिन लाईन्स वर चालत होते.

"आणि समजा छापून आली तर? तू तुझी कथा पुन्हा लिहेपर्यंत ती दुसरीकडे छापली गेली तर?", विनितची ही शक्यताही नाकारता येत नव्हती.

"तर मग मी सांगेन की ही माझी कथा आहे!" राजेश आवेगाने म्हणाला आणि चालायचा थांबला.

"पण, छापलेली कथा पाहून पाहून कुणीही पुन्हा कागदावर लिहू शकतो आणि म्हणू शकतो की ही माझी कथा आहे! कोण विश्वास ठेवेल?", विनित म्हणाला तशी एक लाट जोराने दोघांच्या अंगावर आदळली. दोघेजण ओले झाले.

"तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे. पण मला काही सुचत नाही आहे! पण आपण एक करूया! तू येत्या काही दिवसातल्या पेपरमध्ये ‘कथमंथन’ दिवाळी अंकासदर्भात काही बातम्या येतात का त्या तपासत राहा आणि दिवाळी अंकांची लायब्ररी लावून माझ्या कथेसारखी कथा कुठे छापली गेलीय का ते तपासत राहा! तोपर्यंत मी युद्धपातळीवर माझी कादंबरी पुन्हा लिहायला सुरुवात करतो!"

पुढच्या क्षणी निर्धाराने ते दोघे ओल्या कपड्यांसह झपाझप चालत स्टेशन वर गेले आणि घरी जायला लोकल पकडली. लोकलच्या डब्याच्या खडाखड हलणाऱ्या काही रिकाम्या कड्या बघत तो विचार करत होता. त्या कड्यांचा आवाज सहन न होऊन त्याने हलणाऱ्या दोन कड्या मुठीत पकडल्या.

विक्रोळी स्टेशनवर गाडी थांबली. एवढया भयानक गर्दीत त्याची आई अचानक पाण्याचा ग्लास हातात घेऊन सहजपणे लोकलमध्ये शिरली आणि त्याला गदागदा हलवू लागली, "राजेश! अरे असा रात्रभर बसून छताकडे बघून काय विचार करतोयस? हे घे पाणी पी!" तो तंद्रीतून जागा झाला. आई लोकलमध्ये आली नसून आपली तंद्री भंग पावली हे त्याला कळले.

"बरा आहेस ना?"

"हो बरा आहे ! झोप तू!" पलंगावर बसलेला राजेश पाण्याचा ग्लास घेऊन म्हणाला.
 
66
1
8
वलय - प्रकरण १७

सकाळी दहा वाजता आईने बनवलेलं भाजणीचं थालीपीठ हिरव्या मिरच्यांच्या ठेच्यासोबत खातांना राजेश आईला म्हणाला, "मस्त झालंय थालीपीठ आणि ठेचा! आणि सोबत ताजं दही असल्याने झकास बेत आहे. आता दुपारी तीनेक वाजेपर्यंत तरी भूक लागणार नाही. मी नाश्टा झाला की धर्मापूरला जाऊन येतो जरा."

"अरे राजेश! काय नुसता फिरत असतोस? आजच्या दिवस आराम केला असतास, मग उद्या गेला असतास. आज आपल्या गावातल्या नदीवरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात संध्याकाळी जाऊ आपण!"

"आई! मी येतांना तुला फोन करीन मग तू ये तिथे. मला आज धर्मापूरला जाणे जरुरीचे आहे!!"

"जा बाबा जा! मी सांगितले तरी तू तुझ्या मनाप्रमाणेच करणार आहे ते माहित आहे मला! पण संध्याकाळी लवकर ये! उद्या गोडंबे काका आणि त्यांची सुनंदा येणार आहेत आपल्याकडे! तू येणार आहेस म्हणून बोलावून घेतले मुद्दाम त्यांना! तुला आधीच सांगितले असते तर तू मुंबईहून आलाच नसतास इकडे! टाळाटाळ केली असतीस!"

"अगं आई, हे काय चालवलंयस तू? मी तुला मागच्या वेळेस सुद्धा सांगितले होते की मी लग्न करणार नाही आहे. सुनंदाशी तर नाहीच!"

"आता बास झालं राजेश! एक शब्द बोलू नको! आतापर्यंत ऐकत आले तुझं पण आता मी तुझं ऐकणार नाही! मी गोडंबे काकांना शब्द दिलाय. तुझं लग्न होईल तर त्या सुनंदाशीच!"

"आई मला थालीपीठ खाऊ दे!"

"अरे आरामात खा! अजून दोन थालीपीठ घे आणि पोटभर खा! पण, खाल्ल्यावर मी तुला पुन्हा हेच सांगणार आहे की सुनंदा आपली सून होईल! इतर काही ऐकू नकोस पण हे मात्र माझे तुला ऐकावेच लागेल!"

"अगं आई, मला तुलाही घेऊन कायमचा मुंबईत जायचा विचार आहे. ती आणि तिचे कुटुंब खूप खेडवळ आहेत! त्यांना माझी ही अशा प्रकारची नोकरी आवडणार नाही. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राबद्दल गावाकडे बरेच समज गौरसमज आहेत! आणि मी जरी तिला लहानपणापसून बघितले आहे तरीही तीच्याकडे मी त्या भावनेने बघितले नाही!"

"मला बहाणे नकोत! त्या भावनेने बघितले नाहीस ना? मग लग्न झाल्यावर बघ त्या भावनेने! तुला माहीत आहे ना आपण वचन दिलंय त्यांना?"

"वचन बिचन या सगळ्या लहानपणच्या गोष्टी आहेत! आम्ही मोठे झालो आता. विसरा ती वचनं!!"

"अरे त्या गोष्टी लहानपणाच्या असल्या म्हणून काय झालं? काळानुसार वचन हे वचनच राहते! आणि गोडंबे काकांनी आपल्याला किती मदत केली आहे माहित आहे ना तुला? त्याची परतफेड नको करायला?"

"अगं आई वेळोवेळी तू आणि मी पण त्यांच्या मदतीला धावून गेलोच आहोत की!" राजेशने आठवण करून दिली.

"हे वचन तुझ्या बाबांनी दिलं आहे हे ठावूक असूनही तू असा का वागतोस राजेश?" आई अर्धे रडून आणि अर्धे संतापून पदराने डोळे पुसत बोलली.

"थालीपीठ हळूहळू बेचव का होते आहे बरं? दही पण जरा जास्तच आंबट आहे! " उपरोधाने राजेश म्हणाला.

"हो का? सुनंदा थालीपीठ बनवेल तेव्हा चव परत येईल हळूहळू! काळजी करू नकोस हं बाळा!" आईसुद्धा दुप्पट उपरोधाने म्हणाली.

काही केल्या आई आणि तिची सुनंदा पाठ सोडणार नव्हती त्यामुळे शांततेने थालीपीठ पूर्ण खून संपवल्यानंतर मनातला चढणारा संताप दाबून टाकत राजेश शक्य तितक्या हळू ताटावरून उठला. हो किंवा नाही न म्हणता मौन राहून तो कपडे घालू लागला.

कधी कधी कुणी हो म्हणायचे असले तरी मौन बाळगतात आणि कुणी नाही म्हणायचे असले तर मौन पत्करतात. कुणाकुणाला हो किंवा नाही यापैकी काहीच म्हणायचे नसते तेव्हा मौन राहतात. पण समोरचा त्या मौनाचा स्वत:च्या सोयीनुसार अर्थ घेतो. राजेशच्या आईनेही त्याच्या मौनाचा होकारार्थी अर्थच गृहीत धरला, भले त्याने आताच स्पष्ट संवादातून स्पष्ट नकार पोहोचवला का असेना!

एकदाचा पाठीवर सॅक घेऊन तो राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी मध्ये बसला. बसमध्ये तुरळक गर्दी होती....

त्याने खिडकीजवळची जागा पकडली. कंडक्टर कडून तिकीट काढले आणि खिडकीतून बाहेर बघू लागला. गाडी सुरु झाली. खिडकीतून गार वारा येत होता.

आईच्या सकाळच्या लग्नासंदर्भातील चर्चेचे त्याच्या मनात विचार आले येऊ लागले.

"मी माझ्या लिहिलेल्या कथांमध्ये माझ्या मनाप्रमाणे सभोवतालाचे जग आणि पात्रे तयार करतो आणि ती सगळी पात्रे माझ्या हुकुमानुसार जगतात आणि मरतातसुद्धा! पण, खऱ्या जगातील एक पात्र म्हणजे मी मात्र पूर्ण माझ्या अधीन नाही. मला लग्नासारखा निर्णय आईच्या मर्जीनुसार आणि हुकुमानुसार घ्यावा लागतोय! पण ती सुद्धा कुणाच्या तरी खेळातले एक पात्र आहे? जगाला नियंत्रित करणाऱ्या कुणीतरी शक्तीच्या हातातले ती आणि मी सुद्धा पात्रच आहोत. पण त्याला इलाज नाही. लहानपणी दिल्या गेलेल्या काही वचनांमुळे आणि दिलेल्या शब्दांमुळे, कुणाच्या उपकाराच्या ओझ्यामुळे आणि कर्जामुळे आपण कधीकधी परावलंबी होतो."

खिडकीतून चांगला वारा येत होता. झोप येण्यासारखा हा वारा होता पण मनातील विचार त्याला झोपू देत नव्हते....

राजेशचे विचारचक्र पुन्हा सुरु झाले, "पण मला एक समजत नाही की एखादा व्यक्ती आपल्याला मदत करतो तर खरं, पण त्यामागे त्याची भविष्यातली दूरदृष्टी असू शकते, पण आपल्याला हे आधी त्याची मदत स्वीकारतांना कळत नाही. कसे कळेल? कुणाचे मन थोडेच वाचता येते? काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय कुणी आजकाल मदत करतच नाही का? मदतीच्या उपकारापायी परतफेडीची कुठेतरी अपेक्षा असतेच असते! असायला हवी की नको? ते ठरवणारा मी तरी कोण? आणि त्यातल्या त्यात मी आणि माझे कुटुंब मदत ‘घेणारे’ आहोत त्यामुळे ‘देणाऱ्याने’ अपेक्षा ठेवाव्यात की नको आणि काय ठेवाव्यात हे मी कसे ठरवू शकेन?"

सहजपणे राजेशची नजर बाजूला गेली तेव्हा त्याला दिसले की बाजूच्या सीटवर एकजण "जीवनाचे शिल्पवृक्ष" हे रा. म. मालवणकर यांचे पुस्तक वाचत होता.

त्यानेही ते वाचले होते. पुस्तक बघितल्याने आणी त्यातील काही प्रसंग त्याला वाचल्याचे आठवल्याने त्याचे लग्नाच्या विषयाकडून ध्यान हटले आणि मन भूतकाळात गेले. रात्री आठवलेल्या प्रसंगांच्या पुढचे त्याला आठवू लागले.
 
66
1
8
वलय - प्रकरण १८

विनितने युद्धपातळीवर त्या वर्षीच्या दिवाळी अंकाचा फडशा पाडला. इकडे तिकडे वर्तमानपत्रात तपासले. नवीन प्रकाशित झालेल्या कादंबऱ्याचा आढावा घेतला. तोपर्यंत राजेश कथा लिहिण्यात गुंतला. रात्रंदिवस मेहनत करून त्याने त्याची कथा पुन्हा लिहून काढली.

स्वत:च्याच कथेचे जसेच्या तसे प्रसंग, वाक्य आणि शब्द जरी त्याला आठवले नसले तरी शेवटी कथा त्याने लिहून काढली. विनीतला जमेल तेवढे त्याने संशोधन केले. इतर मित्रानाही त्याने मदतीला घेतले. कुठेच त्याच्या कथेसारखी कथा छापून आलेली नव्हती.

मग आता त्याने पुन्हा नव्याने लिहिलेली ही कथा छापायला द्यायची का?
याचे एखादे पुस्तकच छापायचे का?
कुणी प्रकाशक तयार होईल का?
की स्वत:च प्रकाशित करायची ती कथा?
पुस्तक स्वत: प्रकाशित करण्याइतके भांडवल नव्हते राजेशजवळ!
पुन्हा काही चौर्यकर्म घडले तर?
आणि आता परिक्षा जवळ आल्या आहेत, तेव्हा कथेचे काय करायचे ते नंतर पाहू!
असे म्हणून ती कथा त्याने नंतर कोणालाच आणि कुठेच पाठवली नाही!!

परिक्षा संपल्यानंतर कुणा प्रकाशकाला भेटून बघूया असा त्याने विचार केला.

मग परीक्षा आली.

कथा असलेली लाल रंगाची फाईल त्याने कपाटात ठेवून दिली....

कालांतराने तो हळूहळू त्या विचारांतून बाहेर पडला. अभ्यासाला लागला.

परीक्षा झाली!!

अनेक महिने उलटले...

अधून मधून राजेश वर्तमानपत्रात लिखाण करत होता. लेख लिहित होता. वाचकांचे प्रतसाद येत होते.

त्याचे बहुदा सगळे लेखन संवादात्मक असायचे. एखाद्या विषयावर भाष्य करतांना सरळ लेख न लिहिता तो दोन तीन जण त्या विषयावर चर्चा करा आहेत असे संवाद लिहायचा. एकजण त्या विषयाच्या बाजूने तर दुसरा विरोधात वगैरे असे त्याचे लिखाण लोकाना आवडून जायचे. आता लिखाण पाठवताना योग्य ती खबरदारी तो घेत होता. झेरॉक्स काढून ठेवत होता!!!

या कालावधीत एक गोष्ट चांगली झाली होती की त्याची कथा कोणत्याही दिवाळी अंकात छापून आली नाही आणि ती इतर कुठेसुद्धा पुस्तकरूपाने किंवा इतर कसल्याही प्रकारे छापून आल्याचे त्याला समजले नव्हते.

अधून मधून त्याच्या आईचा सुनंदाबद्दलचा रेटा सुरूच होता.

त्याला कसेतरी हो नाही म्हणत तो तोंड देतच होता.

आई सुनंदाच्या नावाचे अनेक फुल टॉस बॉल टाकायची आणि दर वेळेस तो सुनंदाचा चेंडू सिक्स मारून सीमापार करायचा आणि आई आणखी दुसरा चेंडू लगेच तयार ठेवायची.

दरम्यान वेळ मिळेल तसे राजेशचे वाचन आणि लिखाण सुरूच होते...

जुन्या काळातले राजे आणि राजांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या पुस्तकांचा तो अभ्यास करायचा. चाणक्यबद्दल अनेक पुस्तके त्याने वाचून काढली. त्या कपाटातील त्याने पुन्हा लिहून काढलेल्या कादंबरीबद्दल का कोण जाणे त्याच्या मनात एक उदासीनता निर्माण झाली. कदाचित त्याला त्याद्वारे स्वत:च्या असहायतेची आणि विश्वासघात झाल्याची सतत आठवण होत असावी. त्याने ती कथा पुन्हा बाहेर काढली नाही.

***

एका वर्षांनंतर -

फायनल ईयरला नव्वदच्या वर मार्क पडून तो पास झाला.

तोपर्यंत इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेवर त्याचे चांगले प्रभुत्व आले होते.

कॉलेज संपले होते. सुट्ट्या लागल्या!!

विनीत आणि त्याचे दोन मित्र राजेशकडे आले. तालुक्याच्या गावाला एका मित्राची मोठी गाडी घेऊन जवळच्या थंड हवेच्या ठिकाणी त्यांचे जायचे ठरले. दोन तीन दिवस मुक्काम करून मजा करायची, फिरायचे असे त्यांनी ठरवले. सगळयांच्या परीक्षा संपल्या होत्या त्यामुळे आनंदाचे भरते ओसंडून वाहात होते. ते अगदी सक्काळीच म्हणजे पाच वाजता निघाले. सगळी तयारी आणि समान बरोबर घेतला होता.

चार मित्र आणि फिरायला एक गाडी - अजून काय पाहिजे? अगदी स्वर्गीय सुख! नाही का?

दुपारी बाराला ते अलकापूर या तालुक्याच्या गावी पोहोचले.

तेथून चार तासांचा रस्ता होता – "सावरीमाळ" या थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा!

त्यांनी ब्रेक घेतला आणि एका खाणावळीत ते जेवणासाठी गेले.

विनीत, राजेश, बंडू आणि सोमा असे ते चौघं चार वेगवेगळे पदार्थ मागवून त्यावर ताव मारत होते - झुणका भाकर त्या हॉटेलची खासियत होती. त्यासोबत मिरचीचा कोल्हापूरी झटका, वांग्याचं भरीत, पनीर मटर आणि तवा पुलाव!

बंडू म्हणाला, "अरे यार विनीत, एक आयडीया आहे. ‘मंडोला सिनेमा’ मध्ये ‘किस्मत का खेल’ पिक्चर लागलाय! जाउया का? त्यात दोन सुपरस्टार एकत्र आलेत! - रोहन कुमार आणि अमित श्रीवास्तव. अमितजींनी यात वडिलांची भूमिका केली आहे! आणि रोहन कुमार मुलगा आहे."

सगळ्यांना आयडीया पसंत पडली. अजून त्यावेळेस दूरदर्शन हे एकमेव लोकप्रिय टीव्ही चॅनेल होते. अजून एक प्रायव्हेट चॅनेल होते पण दिवसातून चार तासच त्याचे प्रक्षेपण होते. व्हीसीआरचे सुद्धा प्रस्थ बरेच होते आणि इंटरनेटची अजून सुरुवात होती. पण तरीही मनोरंजनासाठी थिएटर मध्ये जाऊनच लोक सिनेमा बघत.
 

Top